Site icon Gacchivarchi Baug : Grow Organic

वंदणीय वासंती सोर मावशी

Advertisements

तेरवाच लस मिळवली. थकवा आल्यामुळे परवा सारी कामे हळूवार चालली होती. परवा दुपारी अजित भाऊचा फोन आला पण बोलण्याचे त्राण नसल्यामुळे तो काही उचलला नाही. नंतर फोन करून बोलूया म्हणून तसाच बाजूला ठेवला. कदाचीत तिच बातमी असावी. सहसा सकाळी उठून कधीच मोबाईल पाहत नाही. पण त्या दिवशी पाहिला.  जिवन उत्सव ग्रुपवर मेसेज पाहिले. सोर मावशी आपल्यात नाहीत. माझ्यासाठी हा धक्काच होता.  काही काळ शरीर एकदम गळाल्यासारखे झाले. डोळ्यात अश्रू दाटून आले. मावशीना श्रंध्दाजंली वाहिली. मोबाईल बंद केला पण गत काळातील त्यांच्या सोबतचा संवादाची, भेटीच्या क्षणांना भरती आली होती. आठवणीच्या उंच उंच लाटा येवून धडकट होत्या…

मावशीचे वय झाले होते. हे त्यांनाही माहीत होते. कोरोनाच्या आधी त्यांनी आम्हा तिघांना सहकुटुबं भेटायला ये,  नि जेवायला सुध्दा या.  आज येतो उद्या येतो. करत एकदाचे ठरले.

घरी पोहचलो. गप्पा झाल्यात. जेवणं झाली. छोटे छोटे खादीचे रूमाल आम्हाला भेट मिळाली. मावशीना परतीचे गिफ्ट म्हणून आम्ही काहीच आणलं नव्हत. काय द्यायचं हे सुचलंच नाही. कारण त्यांना चरख्यावरील सुतकताई हेच त्यांच गिफ्ट होते पण गेल्या पाच वर्षात त्याला स्पर्शही झाली नव्हता. मनात खंत होतीच. चरखा कसा आहे. तो चालू ठेव.  आता पुन्हा भेट कधी हे मलाही माहित नव्हते. त्यांनतर निर्मल ग्राम निर्माण केंद्रच्या भाऊ नावरेकर स्मृती दिनानिमित्त भेट झाली.

सतेज कांती, स्वच्छ शुभ्र कपडे, मोजके, स्पष्ट बोलणे. त्यां नेहमी माझी विचारपूस करत. कारण माझे आवडते माध्यमांतील काम सोडून पर्यावरणकामाला सुरूवात केली. होती. ठिक चाललय ना. पुरेसे पैसे येतातहेत ना याची ते आवर्जून चौकशी करत.

मध्यंतरी किशोर सोर यांच्या कडे चौकशी केली. थकल्या आहेत. ते साहजिकच होते. मावशीशी फोनवर बोलणे शक्यच नव्हते. कारण या वयात त्यांना आता त्रास देणं अवघड वाटतं होतं. कोरोना काळात त्यांना प्रत्यक्ष भेटणं टाळलं. पण मावशी सोबतची प्रत्येक भेट ही लख्खपणे आवठवत राहते.

सुजल झाला तेव्हा त्यांनी स्वतः हाताने विणून पायमोजे व स्वेटर दिले होते. ही बातमी सुजला सकाळी सकाळी सांगायची नाही. असं आम्ही दोघांनी ठरवलं. ति बातमी त्याला दुपारी सांगीतली. असं कसं झालं असे म्हणून त्यांने जोरात आरोळी ठोकली, मावशी आपल्यात नाही.  हे त्याला काही पटतं नव्हतं. पण त्याला काहीच इलाज नव्हता. संदीपची आई म्हणून त्यांना आईचा व आईला सोर मावशी बद्दल आपुलकी होती. आता मावशी आपल्यात नाही हे आता माझ्या आईला कसं कळवायचं हे फार अवघड वाटतयं.

मावशी तेवढ्याच प्रेमळ होत्या. लहान मोठ्यांच्या त्या मावशी होत्या. आई खालोखाल प्रेम हे मावशीवर होते याचा नेहमी प्रत्यय येतो. रक्ताच्या नात्यां नंतर ही सामाजिक उत्तरदायित्वाच्या रथाचे सारथ्थ करणारी मंडळी नेहमीच वंदनीय असतात. त्यातील एक सोर मावशी होत्या.

गांधीचे नेतृत्व हे किती खोलवर, मातृहद्यी होते याचा प्रत्यय त्यांच्याकडे पाहून यायचा. विनोबा, सानेगुरूजी याच्यांत तर हे रूजले होतेच. पण एका स्त्रीच्या रूपात गांधी पुन्हा भेटावा, आपल्याशी बोलावा गांधीना अनूभवता यावा. या अनुभवणार्या मंडळीत आपण पण एक आहोत. याचा नेहमी आनंद अभिमान वाटतो.

चरखा चालू ठेव. हे त्यांचे मागणे. गच्चीवरची बागेच्या कामात आता हे थोडं मागे पडलयं. घरातला एका कोपर्यात व मनातही चरखा तसाच पडून आहे. तो बंद होणार नाही. व्यावहारिक लोक त्याला उत्पन्नाचे साधन मानतात. पण चरखा हा केवळ उत्पन्न देणारा नाही. तो देवूही शकत नाही. त्यातून निघणारे सूत हा व्यवहार नाही. त्याच्या समोर बसून केलेली सुत कताई ही करूणेची, पर्यावरण रक्षणाची प्रार्थना आहे. असे मला वाटते. मूळातच जगातील कोणतेही यंत्र हे पुरेसा परतावा देवू शकत नाही. त्याला चिटकवलेला परतावा हा केवळ त्याचे बाय प्रोडक्ट असते. त्याच्या अंतस्थ हेतू हा त्याचा खरा परतावा असतो. पर्यावरणाचे काम मनाच्या अबोध कप्प्यात संचीत झालेले होते. ते वर आणण्याचे काम चरख्यावरील सुतकताईच्या साधनने  केले असे मला वाटते, गच्चीवरची बाग वाढत गेली. चरख्याचेच नवे रूप जणू. त्यातूनच उमलेलं हे काम. चरखा बंद झाला पण त्याला एकाग्रतेचे, चिकाटी, साधनेचे पोषणमुल्य आता कमी पडू लागलयं याची खात्री पटू लागलील.

चरख्यावरील सुतकताई चे प्रोडक्ट हे सूत नसून त्याच्या समोर बसून जे काही श्वासांची तंद्री लागते. एकाग्रता साधली जाते त्याकडे पहायला हवे. विपश्यनेच्या तंत्रानंतर जी काही एकाग्रतेची साधना असेन ती चरख्यावरील सूतकताईनेच मिळू शकते. असे मला जावणवले आहे.

मावशीना आपल्या कडून सूतकताई हवी होती. तो कधीही बंद होणार नाही हे माहित आहे पण चालू कधी करता येईल हे आता आपल्या प्रत्येकाला ठरवणे गरजेचे आहे.

कोरोना काळात आमच्या जिवन उत्सवच्या कुटुंबाना फार मोठे धक्के बसले आहे. आचवल ताई, संगीता ताई हे इनर सर्कल मधील मंडळी सोडून गेलीत. आपण प्रत्येक जण घरात सुरक्षित आहेत पण आम्हाला आपले जवळेची मंडळी दुरावलेचे धक्के फार बसले आहेत. हे धक्के एकएकट्यानांच सोसावे लागत आहे. एकत्र येवून एकमेंकाना आधार देणे कोरोनामुळे शक्य नाही. जी काही देवाणं घेवाणं होईल ती दूरध्वनीवर.

मावशी सोबत चरख्यावरील पुस्तक तयार करण्याचा योग आला. कमी शब्दात सुबक शब्द रचना असलेली ही पुस्तिका त्यांच्या अपेक्षे प्रमाणे तयार करता आली यात माझाही खारीचा वाटा होता याचा फार मला आनंद आहे.

 अशा अनेक आठवणी आहेत. ज्या मनात दाटून येतात. डोळे पाणावतात. आमच्या जिवन उत्सव मधील माळेतील एक मणी आज कमी झाला . आमचा मानसिक आधारवड हा कोसळलाय. पण मावशीचा, पर्यायाने गांधीचा चरखा खरचं चालू ठेवूया… पर्यावरण संरक्षणेची हा धागा तुटू देता कामा नये. हीच प्रार्थना.

संदीप चव्हाण, नाशिक..

Exit mobile version