बियाणे उगवून येण्याची न येण्याची कारणे

बियांना संदर्भात बर्याच समज गैरसमज आहेत. या लेखातून तो काही अंशी दुर करण्याचा प्रयत्न करणार आहे.

बिज हे निसर्गाचे अमुल्य अशी सुक्ष्म रूपातील ठेव आहे. ज्याला आपण निसर्गाचा अंश म्हणू शकतो अथवा त्या त्या वनस्पतीचा वंश म्हणू शकतो.

बियाणे कोणतेही असो त्या संबधी बरेच समज, गैरसमज व प्रश्न पसरलेले आहेत.

समज गैरसमज व प्रश्न आहेत ते बघू या..

  • बियाणे वर्षभरांनंतर उगवेल का… अर्थात बियाणे जिंवत आहे की मृतवत…

हा समज काही अंशी खरा आहे… पण तो सर्वच बियाणांसंदर्भात लागू होत नाही. जे बियाणे वजनाला हलके व आकाराला मोठे असते. असे बियाणे हे बराच काळ एकाच ठिकाणी संग्रहीत असेल तर त्या ठिकाणी तेथील ओलावा, दमटपणामुळे त्या बियाणांमधे सुम्क्ष जिवाणूं आतून पोखरण्याची शक्यता असते. उदाः आपण ठेवणीतले कापड हे कालांतराने विरते. हे तर बियाणे आहे. अर्थात ते कुणाचेतरी अन्न आहे.  तसेच बियाणांवर बुरशी येते. काही कालांतराने पोचट होतात, कुजतात. काही बियाणांची वरील साल नाजूक असल्यामुळे गळून जाते. या सार्यांचा परिणाम हा बियाणे रुजण्यावर होत असतो. त्यामुळे ते बियाणे कोणत्या पिरस्थितीत, कुठे व कसे ठेवले आहे. त्याच्यावर काय परिणाम झाला आहे. हे पेरल्यानंतर ते उगवते की नाही हे करून पाहिल्यावरच लक्षात येते.

  • जे बियाणे पाण्यावर तंरगते ते बियाणे खराब…

हो बियाणे निवडी संदर्भात ही अट वापरली जाते. पण बियाणेंच जर निसर्गतः हलके असेल म्हणजे कोमट किंवा गरम पाण्याच्या घनतेपेक्षा त्याची घनता कमी असेन तर बियाणे जिवंत, ताजे असूनही ते तंरगणारच… उदाः आंबट चुका.. खुरसणी,

  • गावरान बियाणे चांगले…व उगवण क्षमता उत्तम असते.

गावरान बियाणे चांगलेच असते. पण नागपूरचे बियाणे हे नाशिकला पूर्णत ( Germination Rate)  व सर्वच बियाणे उगवणार नाही. कारण खुल्या आकाशात (Open Pollination)  वाढवले असल्यामुशे त्यास त्या त्या भौगोलिक जैवविविधता, तेथील तापमान, तेथील पिकाला दिला गेलेला पाण्याचा ताण, पाण्याची प्रतवारी तेथील शत्रु किंवा मित्र किटकांचा सहवास, त्याचे परागीभवन, तेथील रासयनिक खताचा वापर या सर्वाचा त्या त्या बियाणांवर परिणाम होत असतो. जसे की आईच्या पोटातल्या बाळावर त्या त्या परिस्थितीनुरूप, वातावरणानुसार परिणाम होतो आणि महत्वाचे म्हणजे आईची मानसिकता यावर गर्भावर संस्कार ठरत असतात. तेच बियाणंबाबत होत असते. त्यामुळे गावरान बियाणांचा हट्टहास हा चालत नाही.

बियाणे पेरणे हा प्रयोग आहे.. आम्ही परसबागेत बिया पेरतांना नेहमी एक सुत्र सांगतो ते म्हणजे बियाणे रूजण्यासाठी मातीचा पोत, मातीतील ओलावा, त्यातील वाफसा, उष्मा, उबदार पणा, बियांणाची गुणवत्ता, त्याच्या मागील पिढ्यांवर झालेली प्रक्रिया यावर बियाणे उगवून येत असते. त्यामुळे बियाणे हे सात ते पंधरा दिवसात नाही उगवून आले तर दुबार पेरणी करणे गरजेचे असते.

हायब्रिड बियाणे वाईटच… पण सर्वार्थाने नाही….

हाईब्रिड बियाणे हे वाईटच आहे. पण जेनेटिक पेक्षा बरे आहेत. आणि बियाणे हे कोणतेही असो त्याला दिले जाणारे खत पाणी हे जर नैसर्गिक, सेंद्रीय असेल तर त्याचे उत्पादन हे चांगले, खात्रीशीर असतेच. शिवाय त्याची चव सुध्दा अप्रतिम असते. हायब्रिड बियाणे हे त्या त्या वातावरणाला अनुकूल तरी असते. किंवा त्यावर त्या प्रकारे संस्कार केलेले असतात. त्यामुळे या बियाणांची रूजवण क्षमता चांगली असते.

बियाणे लाल, हिरव्या रंगाचे का असते….

बियाणांना कीड लागू नये म्हणून त्यावर हिरव्या किंवा लाल रंगाचे रसायनाचे आवरण दिलेले असते. तसेच बियाणांमधील फरक ओळखण्यासाठी सुध्दा रंगाचा वापर करण्यात येतो. उदाः पालक व बिट यां बियांणामधील फरक लवकर ओळखू येत नाही. अशा वेळेस बिट या बियाणांस लाल रंग दिलेला असतो.

घरातील बियाणे उगवून येत नाही…

घेतले बियाणे लावले की उगवेन या भ्रमात राहू नका. याची नक्की काहीच खात्री नसते. उदाः घऱातील मेथी, धने हे येतीलच याची शाश्वती नसते. कारण घरी वापरले जाणारे मेथी व धने व बियांणासाठी तयार करण्यात आलेले मेथी व धने यात जमीन अस्मानचा अंतर असते. ते कसे पाहूया…

जे किराणा दुकानात विकले जाते ते फक्त धान्य असते. एका फ्लॉटवर मेथी लावली आहे. त्यातील वाढीची अवस्था ही वेगवेगळी असते. त्यात बिज म्हणून पूर्णत वा अंशतः वाढ झालेली मेथी आहे. ती घरगुती वापरासाठी विकली जाते. पण बियांणासाठी असलेला मेथीचा प्लॉट हा पूर्णतः बिज तयार होई पर्यंत शेतातच असते. शिवाय बियाणांसाठी तयार केलेले बियाणांना वेगवेगळी चाचणी, चाळणी केली जाते. त्याची प्रतवारी ठरवली जाते. त्यामुळे आपल्याला बियाणे हे शंभर रू. किलो ही असते तर त्याच प्लॉटमधील तेच बियाणे पण उत्तम प्रकारचे बियाणे हे हजार रू. किलो ही असते.

महागडे  बियाणे आणले तरी त्याची प्रतवारी तयार करा…

बाजारात एकाच कंपनीचे, एकाच वजनाचे विस ते दोनश रूपयांपर्यत बियाणे मिळते. ते घरी आणले, बागेत लावले तरी सर्वच उगवणार नाही. त्याची आकारानुसार प्रतवारी तयार करा. चांगले असलेले बियाणे पेरा. म्हणजे शंभर टक्क उगवण क्षमता मिळेल.

आता या परिस्थितीत यावर उपाय काय…

  • वर सांगितल्या प्रमाणे बियाणे हे सात ते पंधरा दिवासांनी पुन्हा लागवड करणे.
  • बिज संस्कार करणे. ( गो ईत्र पाणी, कोमट दूध पाणी, सकाळी पाण्यात भिजवणे इ.)
  • बियाणांची योग्य वातावरणात रोपे तयार करणे व त्याचे दुसर्या जागेवर पुर्नलागवड करणे.
  • बियाणे हे लागवड करून पहाणे हा शेवटचा पर्याय आपल्या हातात असतो. त्याला काहीही पर्याय नाही.

या सर्वामधे निसर्ग कसा चमत्कार करेन याचा नेम नाही. आपला आजपर्यंत सारा अभ्यास, निष्कर्ष, अनुभव फोल ठरवण्याची क्षमता त्यात आहे. या संदर्भात

काही अनुभव सांगतो. एका घरी भाजीपाल्याची बाग फुलवत होतो. ताईंनी घरातील धने आणून दिले. आम्ही ते छान भरडून व्दिदल करून लावले. कालांतराने मूठभर बियाणांत चार पाच बियाणे उगवून आले. त्यानंतर बियाणे खराब आहे म्हणून ते मातीत फेकून दिले तर शंभर टक्के त्याची उगवण झाली. भेजा फ्राय झाला… येथे निष्कर्ष निघतो की उगवण्यासाठी योग्य वेळेची, तापमानाची, पाणी देण्याची गरज असते. त्यावर योग्य त्या जाडीच्या मातीचा थर देणेही गरजेचे असते.

एकदा… सारखच बियाणं आम्ही पंधरा दिवासाच्या अंतराने एकाच वाफ्यात लागवड केली. पंधरा दिवस आधी केलेले बियाणांची रोपे खुरटली होती. तर पंधरा दिवसांनी लागवड केलेल्या भेंडीच्या बियाणांची रोपे नंतर खांद्या पर्यंत पोहचली होती.

एकदा एका ठिकाणी गच्चीवरील बाग फुलवतांना त्या ताईनी बटाटे लावले. बटाटे दोन तळहातवर मावणार नाही असे मोठे होते. त्याचे चार तुकडे केले. मातीत लावले. चार महिने पाणी देवूनही ते होते तसेच होते. याचे कारण म्हणजे ते बटाटेच रासायनिक खतांवर तयार केलेले होते.

घरच्या बियाणांचे उत्पादन कमी होत गेले…

गच्चीवरची बाग फुलवंताना आम्ही गावरान बियाणांचा आग्रह धरत होतो. नेमाने काही वर्ष वाल, चवळी, भेंडी यांची बियाणे करत असे व पेरत असे. पण लक्षात आले की वर्षागणीक त्याचे उत्पादन कमी कमी होत गेले. याचा अर्थ बियाणे हे घरचे असले तरी त्यास शेतातील, जंगलातील, पंचक्रोशीतील जी काही बहुजैवविविधता गरजची असते ती आपल्याला पुरवता आली नाही. शिवाय दिवंसेदिवस वातावरणात वाढत जाणारी सुक्ष्म धुळ, धुलीकण हे सुध्दा बियाणांच्या परिपक्कवतेवर, त्याच्या उपजकतेचवर परिणाम करणारी ठरत आहे. उदाः वाढता रासायनिक अन्नाचा परिणाम हा पुरूषांच्या शुक्राणू व स्त्रीयांच्या स्त्री बिजांडावर परिणाम होताना दिसत आहेत. व त्याचा अंतीम परिणाम म्हणजे आपल्याकडील मुल आता चायनिज (कार्टून) दिसू लागली आहेत. असो.. त्याचा आणखी एक परिणाम म्हणजे आता प्रत्येक शहरात कृत्रीम गर्भधारणा करणारी सेंटर्स वाढलेली दिसतात.

असे अनेक गोष्टींचा बियाणांसंदर्भात अनुभव येत असतो. तसेच आपल्या कुंडीतील माती, मातीचा पोत, त्यातील वाफसा, खेळती हवा, पाण्याचे केलेले सिचंन याचाही परिणाम होतो. परिणामी बियाणे रूजत नाही.

तरीही माघार घ्यायची नाही. बियाणे पेरत रहाणे हा एकच पर्याय आपल्या हाती असतो. तेव्हां लगे रहो..

8087475242 व 9850569644 या दोनही क्रमांकावर वेगवेगळे अपडेटस देत असतो. आपल्याला हे अपडेट्स मिळतात ना याची खात्री करा व संपर्कात रहा.

संदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक.